श्री गणेशाय नमः ब्राह्मणांनी स्वस्तिमंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली. माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते. त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती. सुंदर गालांवर कुंडले डोलत होती. तिचे मुख लज्जायुक्त मंद हास्याने शोभत होते. तिची कंबर बारीक होती. पुष्ट असे दोन्ही स्तन केशरी चंदनाची उटी लावलेले होते. जेव्हा ती चालत असे, तेव्हा तिच्या पायातील नूपुरांचा मधुर झंकार निघत होता. त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती. आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्यमुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती. परंतु गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, देव इत्यादींमध्ये तिला असा पुरूष आढळला नाही. जो तपस्वी होता, त्याने क्रोधावर विजय मिळवलेला नव्हता. कोणाला ज्ञान होते, परंतु तो अनासक्त नव्हता. कोणी थोर होते, परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते. ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो, त्याला ईश्वर कसे म्हणायचे ? काहीजण धर्माचे आचरण करणारे होते, परंतु त्यांचे प्राण्यांवर प्रेम नव्हते. क्वचित त्याग होता, परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता. काहींच्या मध्ये शौर्य होते, परंतु ते काळावर मात करणारे नव्हते. सनकादिकांसारखे जे गुणातीत होते, ते वर होणारे नव्हते. काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे, परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही. काहींचे वर्तन मला योग्य आहे, परंतु त्यांच्या आयुष्याविषय सांगता येत नाही. काही जणांमध्ये दोन्हीही गोष्टी आहेत, परंतु त्यांचे वागणे अमंगळ असते आणि सर्व मंगल ज्यांच्या ठायी आहेत, ते मला इच्छित नाहीत.
असा विचार करुन श्रीलक्ष्मीदेवीने आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांना वर म्हणून निवडले. कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत. आणिमादी सिद्धी त्यांची इच्छा धरतात; परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत. शिवाय लक्ष्मीदेवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत. म्हणून तिने त्यांनाच वरले. जिच्याभोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधून गुंजारव करीत आहेत. अशी ताज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मीदेवीने भगवंतांच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्ष:स्थळाकडे पाहात ती त्यांच्याजवळच उभी राहिली. त्रैलोक्यनिर्मात्या भगवंतांनी त्या जगज्जननी श्रीलक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्ष:स्थळावरच स्थान दिले. लक्ष्मीदेवीने तेथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्रकटाक्षांनी तिन्ही लोक, लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळी शंख, तुतारी, मृदंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरांसहित गाऊ-नाचू लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव, प्रजापती आणि प्रजा लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले. परीक्षिता, इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली, तेव्हा ते निर्बल, आळशी, निर्लज्य आणि लोभी झाले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा