श्री गणेशाय नमःश्रीशुक म्हणतात - भगवंतांनी असे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास परत अंबरीषाकडे आले आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले. दुर्वासांचे हे कृत्य पाहून आणि त्यांनी पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल अंबरीषाने भगवंतांच्या त्या चक्राची स्तुती केली.
अंबरीष म्हणाला - हे सुदर्शना ! तू अग्नी, भगवान सूर्य, नक्षत्रमंडळाचा अधिपती चंद्र आहेस. जल, पृथ्वी, आकाश, वायू, पंचतन्मात्रा आणि सर्व इंद्रियेसुद्धा तूच आहेस. भगवंतांना प्रिय,एक हजार दात असणाऱ्या, हे सुदर्शना ! मी तुला नमस्कार करतो. सर्व अस्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या चक्रा ! तू या ब्राह्मणाचे रक्षण कर. तूच धर्म, मधुर आणि सत्य वाणी, सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वतः यज्ञसुद्धा आहेस. तू सर्व लोकांचा रक्षक तसाच सर्वलोकस्वरुपसुद्धा आहेस. परम पुरुष परमात्म्याचे श्रेष्ठ तेज तू आहेस. हे सुनाभा, तू सर्व धर्मांच्या मर्यादांचा रक्षणकर्ता आणि अधर्माचे आचरण करणाऱ्या असुरांचे भस्म करणारा अग्नि आहेस. तू तिन्ही लोकांचा रक्षक, विशुद्ध तेजोमय, मनोवेगासारखा गतिमान आणि अद्भूत कर्मे करणारा आहेस. तुला नमस्कार असो. मी तुझी स्तुती करतो. हे वेदवाणीच्या आधीश्वरा ! तुझ्या धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो आणि सूर्य इत्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण होते. तुझा महिमा जाणणे कठीण आहे. लहान-मोठे असे हे सर्व कार्यकारणात्मक जग तुझेच स्वरूप आहे. हे अजिंक्य सुदर्शन चक्रा ! ज्यावेळी निरंजन भगवान तुला सोडतात, तेव्हा तू दैत्य- दानवाच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्यांचा भुजा, पोट, जांघा, पाय, मान इत्यादी अवयव कापीत अत्यंत शोभिवंत दिसतोस. हे विश्वरक्षका ! सर्वांचे प्रहार सहन करणाऱ्या तुला गदाधारी भगवंतांनी दुष्टांच्या नाशासाठीच नेमले आहे. तू आमच्या कुलाच्या भाग्योदयासाठी दुर्वासांचे कल्याण कर. आमच्यावर तुझा हाच मोठा उपकार ठरेल. मी जर काही दान केले असेल, यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचे उत्तम पालन केले असेल, जर आमच्या वंशातील लोक ब्राह्मणांनाच आपले दैवत समजत असतील, तर दुर्वासांचा त्रास नाहीसा होवो. सर्व गुणांचे एकमेव आश्रय असणाऱ्या भगवंतांना जर मी समस्त प्राण्यांच्या आतम्याच्या रूपात पाहिले असेल आणि ते माझ्यावर प्रसन्न असतील, तर दुर्वासांचा सर्व त्रास दूर होवो.
श्रीशुक म्हणतात - दुर्वासांचा सगळ्या बाजूंनी दाह करणाऱ्या भगवंतांच्या सुदर्शन चक्राची राजाने अशी स्तुती केली, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे ते चक्र शांत झाले. जेव्हा दुर्वास चक्राच्या आगीपासून मुक्त झाले आणि त्यांचे चित्त स्वस्थ झाले, तेव्हा ते त्या राजाला उत्तम आशीर्वाद देते त्याची प्रशंसा करू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा