श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - विरूप, केतुमान आणि शंभू असे अंबरीषाचे तीन पुत्र होते. विरूपाचा पृषदश्र्व आणि त्याचा पुत्र रथीतर होता. रथीतराला संतान नव्हते. वंश-परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्याने अंगिरा ऋषींना प्रार्थना केली. त्यांनी त्याच्या पत्नीपासून ब्राह्मतेज आणि संपन्न असे अनेक पुत्र उत्पन्न केले. ते जरी रथीतराच्या पत्नीपासून उत्पन्न झाले होते, म्हणून रथीतराचे जे गोत्र होते तेच यांचे असावयास पाहिजे होते, तरीसुद्धा ते आंगिरसच म्हणविले गेले. हे रथीतर वंशाचे श्रेष्ठ पुरुष होते. कारण क्षत्रिय आणि ब्राह्मण अशा दोन्ही वर्णांशी त्यांचा संबंध होता.
एकदा मनूच्या शिंकण्याने त्याच्या नाकातून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला. इक्ष्वाकूचे शंभर पुत्र होते. विकुक्षी, निमी आणि दंडक हे त्यांपैकी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांच्याहून धाकटे पंचवीस पुत्र आर्यावर्ताच्या पूर्व भागाचे आणि पंचवीस पश्चिम भागाचे तसेच वरील तिघेजण मध्य भागाचे अधिपती झाले. उरलेले सत्तेचाळीस दक्षिण इत्यादी अन्य प्रांतांचे अधिपती झाले. एकदा इक्ष्वाकूने अष्टका श्रद्धाचे वेळी थोरल्या पुत्राला आज्ञा केली की, "विकुक्षे ! लगेच जाऊन श्राध्दाला योग्य पवित्र पशूचे मांस आण. " " ठीक आहे" असे म्हणून वीर विकुक्षी वनात गेला. तेथे त्याने श्राद्धासाठी योग्य अशा पुष्कळ पशूंची शिकार केली. तो थकला होता आणि त्याला भूकही लागली होती. म्हणून श्रद्धासाठी मारलेला पशु आपण खाऊ नये, हे विसरून त्याने एक ससा खाल्ला. विकक्षीने उरलेले मांस आणून आपल्या पित्याला दिले.इक्ष्वाकूने त्यावर प्रोक्षण करायला आपल्या गुरूंना सांगितले. तेव्हा गुरुजींनी सांगितले की, हे मांस दूषित आणि श्राद्धासाठी अयोग्य आहे. गुरुजींच्या सांगण्यावरून इक्ष्वाकूला आपल्या पुत्राने केलेल्या कृत्याचा उलगडा झाला. शास्त्रीय विधीचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या पुत्राला रागाने त्याने आपल्या देशातून बाहेर घालविले. त्यानंतर इक्ष्वाकूने आपले गुरुदेव वशिष्ट यांच्याबरोबर ज्ञानविषयक चर्चा केली आणि योगाने शरीराचा त्याग करून परमपद प्राप्त करून घेतले. पित्याचा देहांत झाल्यानंतर विकुक्षी आपल्या राजधानीत परत आला आणि तो या पृथ्वीचे राज्य करू लागला. त्याने मोठमोठ्या यज्ञांनी भगवंतांची आराधना केली आणि जगात तो शशाद नावाने प्रसिद्ध झाला. इकुक्षीच्या पुत्राचे नाव पुरंजय होते. त्याला कोणी 'इंद्रवाह' तर कोणी 'ककुत्स्थ' म्हणतात. ज्या कर्मामुळे त्याला ही नावे पडली, ते ऐक.
सत्ययुगाच्या शेवटी देवांचे दानवांशी घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये देवांचा दैत्यांकडून पराभव झाला. तेव्हा त्यांनी आपल्याला साहाय्य करण्यासाठी विर पुरं ज्याला आपला मित्र बनवले. पुरंजयाला आपला मित्र बनविले पुरंजय म्हणाला की, "जर देवराज इंद्र माझे वाहन होतील, तर मी युद्ध करीन. " प्रथम इंद्राने हे मानले नाही. परंतु देवाधिदेव सर्वशक्तिमान विश्वात्मा भगवंतांच्या सांगण्यावरून शेवटी तो एक अतिशय मोठा बैल झाला. सर्वांतर्यामी भगवान विष्णूंनी आपल्या शक्तीने पुरंजयाला सिद्ध केले. त्याने कवच धारण करून दिव्य धनुष्य आणि तीक्ष्ण बाण घेतले. त्यानंतर बैलावर चढून तो त्याच्या वशिंडावर बसला. जेव्हा तो युद्धासाठी तयार झाला, तेव्हा देव त्याची स्तुती करू लागले. देवांना बरोबर घेऊन त्याने पश्चिमेकडे असलेल्या दैत्यांच्या नगराला घेतले. वीर पुरंजयाचा दैत्यांच्या बरोबर अत्यंत रोमांचकारी घोर संग्राम झाला. युद्धामध्ये जे जे दैत्य त्याच्यासमोर आले, त्यांना पुरंजयाने बाणांनी यमाच्या हवाली केले. त्या प्रणयकालीन धगधगत्या आगीप्रमाणे होणाऱ्या बाणांच्या वर्षावाने छिन्नभिन्न झालेले दैत्य रणभूमी सोडून आपापल्या स्थानी पळून गेले. पूरंजयाने त्यांचे नगर, धन आणि ऐश्वर्य, सर्व काही जिंकून इंद्राला दिले. म्हणूनच त्या राजर्षीला 'पूर' जिंकल्याकारणाने 'पुरंजय' , इंद्राला वाहान बनविल्याने इंद्रवाह' आणि बैलाच्या ककुदावर (वशिंडावर) बसल्याकारणाने 'ककुत्स्थ' म्हटले जाते.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा