बली म्हणाला - प्रभो, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला, तेव्हा तेवढ्यानेही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते, तेच फळ मला मिळाले. लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही, ती माझ्यासारख्या असुरावर केलीत.
श्रीशुक म्हणतात - वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू, ब्रह्मदेव व शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्यासह तो सुतल लोकात गेला. अशा प्रकारे भगवंतांनी बळीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले; अदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वत: उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले. जेव्हा प्रल्हादांनी पाहिले की, माझा वंशज नातू राजा बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंतांचा कृपाप्रसाद प्राप्त झाला, तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्यांनी भगवंतांची स्तुती केली.
प्रल्हाद म्हणाले - प्रभो, हा कृपाप्रसाद कधी ब्रह्मदेव, लक्ष्मी आणि शंकरांनासुद्धा प्राप्त झाला नाही, तर दुसऱ्यांची गोष्टच कशाला ? अहो, विश्ववंद्य ब्रह्मदेवादीसुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात, तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात. हे शरणागतवत्सल प्रभो, ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंदरस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात. आम्ही तर जन्मत:च दुर्जन आणि कुमार्गगामी आहोत. असे असता आमच्यावर आपली अशी अनुग्रहपूर्णदृष्टी कशी काय वळली ? आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळताखेळताच त्रिभुवनाची रचना केलीत. आपण सर्वज्ञ, सर्वात्मा आणि समदर्शी आहात. तरीसुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत. आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता. तरीही उपासना करणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपाती आणि विन्मुख असणाऱ्यांच्या बाबतीत निर्दय बनता !
श्रीभगवान म्हणाले - बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. आता तू सुतल लोकात जा. तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जातिबांधवांना सुखी कर. तेथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील. माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहील्याकारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होतील.
श्रीशुक म्हणतात - राजा, सर्व दैत्यसेनेचे स्वामी शुद्धबुद्धी प्रल्हादांनी 'ठीक' असे म्हणून हात जोडून, भगवंतांची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली. नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकाकडे निघून गेले. परीक्षिता, त्यावेळी भगवान श्रीहरींनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांना म्हटले. ब्रह्मन, आपला शिष्य यज्ञ करीत होता. त्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल, ती आपण पूर्ण करावी. कारण कर्म करण्यात जी उणीव राहाते, ती ब्राह्मणांच्या कृपादृष्टीने दूर होते.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा