परीक्षिता, त्याचवेळी त्याच्या प्रारब्धामुळे एका बलाढ्य मगराने रागाने त्याचा पाय पकडला. अशा तऱ्हेने योगायोगाने संकटात सापडलेल्या त्या अत्यंत बलवान गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. दुसरे हत्ती, हत्तिणी आणि त्यांच्या पिल्लांनी पाहिले की, त्यांच्या स्वामीला एक बलवान मगर मोठ्या वेगाने ओढून नेत आहे आणि तो अत्यंत घाबरलेला आहे. त्यांना अतिशय दुःख झाले. ते चित्कार करू लागले. पुष्कळांनी त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ते असमर्थ ठरले. गजेंद्र आणि मगर आपआपली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते. कधी गजेंद्र मगराला बाहेर ओढीत होता तर कधी मगर गजेंद्रला आत ओढीत होता. परीक्षिता, अशा प्रकारे झुंज चालू असता एक हजार वर्षे निघून गेली. तरीही दोघेजण जिवंत होते, हे पाहून देवसुद्धा आश्र्चर्यचकित झाले.
पुष्कळ काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढला गेल्यामुळे शेवटी गजेंद्राराचे शरीर थकले. त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही की, मनामध्ये उत्साह राहिला नाही. इकडे मगर जलचरच होता. असे असल्याने त्याची शक्ती क्षीण होण्याऐवजी वाढली. अशा प्रकारे शरीरबलाचा अभिमान असणारा तो गजेंद्र एकाएकी प्राणसंकटात सापडला आणि स्वतःला सोडवून घेण्यात जेव्हा असमर्थ ठरला, तेव्हा आपल्या सुटकेच्या उपायावर त्याने पुष्कळ विचार केला. शेवटी त्याने ठरविले. "हा मगर म्हणजे विधात्याने मला लावलेला फासच आहे. याने मी कासावीस झालो आहे. हे माझे बांधव हत्तीसुद्धा जर मला या संकटातून सोडवू शकत नाहीत, तर या बिचाऱ्या हत्तिणी कोठून सोडवू शकतील ? म्हणून आता मी परमेश्वरालाच शरण जातो. अत्यंत प्रचंड वेगाने धावणाऱ्या काळरूप सर्पाला भिऊन जो कोणी शरण येतो, त्याला जो वाचवतो, तसेच ज्याच्या भीतीने मृत्यूसुद्धा आपले काम करतो, तो जो कोणी जगदीश्वर असेल, त्यालाच मी शरण आहे.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा