गजेंद्र म्हणाला - जे जगाचे मूळ कारण आहेत आणि सर्वांच्या हृदयामध्ये क्षेत्रज्ञरूपात विराजमान आहेत, तसेच सर्व जगाचे एकमात्र स्वामी आहेत, ज्यांच्यामुळे हे विश्व चेतनस्वरूप आहे, त्या भगवंतांना नमस्कार करून मी त्यांचे ध्यान करतो. हे विश्व ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या सत्तेने प्रतीत होते, ज्यांनी हे व्यापले आहे आणि जे स्वतः याच्या रूपाने प्रगट झाले आहेत आणि जे, हे विश्व आणि त्याचे कारण प्रकृती यांच्याही पलीकडे आहेत, त्या स्वयंभू भगवंतांना मी शरण आलो आहे. हे विश्व ज्यांच्या मायेने स्वतःमध्ये निर्माण झाले आहे, ते कधी प्रतीत होते तर कधी नाही; परंतु ज्यांची दृष्टी जशीच्या तशी एकसारखी असते, जे विश्वाचे साक्षी असून प्रगट व अप्रगट या दोन्ही विश्र्वांना पाहातात, जे सर्वांचे आणि स्वतःचेही मूळ आहेत, प्रकृतीच्याही पलीकडे असणारे ते प्रभू माझे रक्षण करोत. ज्यावेळी लोक, लोकपाल आणि या सर्वांना कारणीभूत असणारे संपूर्णपणे नष्ट होऊन जातात, त्यावेळी फक्त अत्यंत घनघोर आणि निबिड अंधारच अंधार राहातो. परंतु जे अनंत परमात्मा सर्वथैव त्याच्याही पलीकडे विराजमान असतात, ते प्रभू माझे रक्षण करोत. जे नटाप्रमाणे अनेक वेश धारण करतात, त्यांचे वास्तविक स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत, तर मग सामान्य प्राणी कसा जाणील ? ज्यांच्या लीलांचे रहस्य जाणणे अत्यंत कठीण आहे, हे प्रभु माझे रक्षण करोत. ज्यांच्या परम मंगलमय स्वरूपाचे दर्शन करण्यासाठी महात्मे लोक आसक्तींचा त्याग करून वनात जाऊन अखंडपणे ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करतात, तसेच आपलाच आत्मा सर्वांच्या ठिकाणी विराजमान आहे, असे जाणून सर्वांचे कल्याण करतात, त्या मुनींचे सर्वस्व असणारे भगवान माझे रक्षण करोत. तेच माझी गती होत. ज्यांना जन्म-कर्म नाम-रूप नाही, की ज्यांच्यात गुण-दोष नाहीत. असे असून सुद्धा विश्वाची निर्मिती आणि संहार करण्यासाठी वेळोवेळी ते आपल्या मायेने त्यांचा स्वीकार करतात. त्या अनंत शक्तिमान सर्वैश्वर्यसंपन्न परमात्म्याला मी नमस्कार करतो. ते अरूप असूनही बहुरूप आहेत. त्यांची कर्मे अत्यंत आश्चर्यमय आहेत. माझ्या त्यांना नमस्कार. स्वयंप्रकाश, सर्वांचे साक्षी (अशा) परमात्म्याला मी नमस्कार करतो. जो मन, वाणी आणि चित्त यांना कळत नाही. त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा