त्या पर्वताचे कडे निरनिराळ्या जंगली जनावरांच्या झुंडींनी सुशोभित झालेले असत. अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या देवतांच्या उद्यानांमध्ये सुंदर पक्षी मधुर कंठाने गात असत. त्याच्यावर पुष्कळशा नद्या आणि सरोवरे होती. त्यातील पाणी अत्यंत निर्मळ होते. त्यांच्या काठावर रत्नांची वाळू चमकत असे. त्यांमध्ये देवांगना स्नान करीत असत. त्यांमुळे त्यांतील पाणी अत्यंत सुगंधित होऊन जाई. तो सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहात असे.
त्रिकूटाच्या दरीमध्ये महात्मा भगवान वरुणाचे एक उद्यान होते. ऋतुमान असे त्याचे नाव होते. देवांगणा त्यात क्रीडा करीत असत. तेथे सगळीकडे नेहमी फळाफुलांनी बहरलेले दिव्य वृक्ष शोभत होते. त्या उद्यानात मंदार, पारिजात, गुलाब, अशोक, चाफे, आम्रवृक्ष, फणस, आंबाडा, सुपारी, नारळ, खजूर, महाळुंग,मोह, सागवान, ताड, तमाल,असणा, अर्जुन, रिठा, औदुंबर, पिंपरी, वड, पळस, चंदन, लिंब, कांचन, साल, देवदार, द्राक्ष, ऊस, केळी, जांभूळ,बोर, रुद्राक्ष, हरडा, आवळा, बेल, कवठ, ईडलिंबू, बिब्बा इत्यादी वृक्ष डोलत होते. त्या उद्यानात एक मोठे सरोवर होते. त्यात सोनेरी कमळे उमललेली होती. याशिवाय निरनिराळ्या जातीच्या कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल, कमळांच्या सौंदर्याने ते शोभून दिसत होते. त्यांवर धुंद भुंगे गुंजारव करीत होते. पक्ष्यांचा मनोहर किलबिलाट चालू होता. तेथे हंस, कारंडव चक्रवाक आणि सारस पक्ष्यांचे थवे होते. पाणकोंबड्या आणि चातक यांचे कूजन चालू होते. मासे आणि कासव यांच्या हालचालींमुळे कमळपुष्पे डोलत होती आणि त्यांचे झडलेले पराग पाणी सुगंधित करीत होते. कदंब, वेत, बोरू, कंदबवेल, इत्यादी वृक्षांनी ते वेढलेले होते.
कुंद, कोरांटी, अशोक, शिरीष, कुडा, हिंगणबेट, कटिशेवंती,सोनजुई, नागचाफा, पुन्नाग, जाई, मोगरा, शेवंती, कस्तुरमोगरा, कदंब इत्यादी पुष्पवृक्ष, तसेच पटावरील प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्यागार राहणाऱ्या इतर वृक्षांनी ते अत्यंत शोभायमान दिसत असे.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा