२३ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय दुसरा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा एक प्रसिद्ध, सुंदर, श्रेष्ठ पर्वत होता. तो दहा हजार योजने उंच होता. त्याची लांबी- रुंदी सुद्धा चारी बाजूंनी तेवढीच होती. त्याच्या चांदी, लोखंड आणि सोन्याच्या तिन्ही शिखरांच्या तेजाने समुद्र, दिशा आणि आकाश झगमगत असत. आणखीही त्याची कितीतरी अशी शिखरे होती की जी रत्ने आणि धातूंच्या रंगीबिरंगी छटांणी सर्व दिशा प्रकाशित करीत असत. त्यांच्यावर वेगवेगळ्या जातीचे वृक्ष, वेली आणि झुडपे होती. झऱ्यांच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याने ती निनादित होत. सर्व बाजूंनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पाया धूत, त्या पर्वतावरील हिरवे पाचू (रत्ने) तेथील जमीन हिरवीगार करीत. सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर,नाग,किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठी येत. जेव्हा त्यांच्या संगतीच्या ध्वनीचा गुहांमध्ये प्रतिध्वनी उमटत असे, तेव्हा मोठमोठे सिंह त्याला दुसऱ्या सिंहाचा आवाज समजून आपणही जोराने गर्जना करीत.
त्या पर्वताचे कडे निरनिराळ्या जंगली जनावरांच्या झुंडींनी सुशोभित झालेले असत. अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या देवतांच्या उद्यानांमध्ये सुंदर पक्षी मधुर कंठाने गात असत. त्याच्यावर पुष्कळशा नद्या आणि सरोवरे होती. त्यातील पाणी अत्यंत निर्मळ होते. त्यांच्या काठावर रत्नांची वाळू चमकत असे. त्यांमध्ये देवांगना स्नान करीत असत. त्यांमुळे त्यांतील पाणी अत्यंत सुगंधित होऊन जाई. तो सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहात असे.
त्रिकूटाच्या दरीमध्ये महात्मा भगवान वरुणाचे एक उद्यान होते. ऋतुमान असे त्याचे नाव होते. देवांगणा त्यात क्रीडा करीत असत. तेथे सगळीकडे नेहमी फळाफुलांनी बहरलेले दिव्य वृक्ष शोभत होते. त्या उद्यानात मंदार, पारिजात, गुलाब, अशोक, चाफे, आम्रवृक्ष, फणस, आंबाडा, सुपारी, नारळ, खजूर, महाळुंग,मोह, सागवान, ताड, तमाल,असणा, अर्जुन, रिठा, औदुंबर, पिंपरी, वड, पळस, चंदन, लिंब, कांचन, साल, देवदार, द्राक्ष, ऊस, केळी, जांभूळ,बोर, रुद्राक्ष, हरडा, आवळा, बेल, कवठ, ईडलिंबू, बिब्बा इत्यादी वृक्ष डोलत होते. त्या उद्यानात एक मोठे सरोवर होते. त्यात सोनेरी कमळे उमललेली होती. याशिवाय निरनिराळ्या जातीच्या कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल, कमळांच्या सौंदर्याने ते शोभून दिसत होते. त्यांवर धुंद भुंगे गुंजारव करीत होते. पक्ष्यांचा मनोहर किलबिलाट चालू होता. तेथे हंस, कारंडव चक्रवाक आणि सारस पक्ष्यांचे थवे होते. पाणकोंबड्या आणि चातक यांचे कूजन चालू होते. मासे आणि कासव यांच्या हालचालींमुळे कमळपुष्पे डोलत होती आणि त्यांचे झडलेले पराग पाणी सुगंधित करीत होते. कदंब, वेत, बोरू, कंदबवेल, इत्यादी वृक्षांनी ते वेढलेले होते.
कुंद, कोरांटी, अशोक, शिरीष, कुडा, हिंगणबेट, कटिशेवंती,सोनजुई, नागचाफा, पुन्नाग, जाई, मोगरा, शेवंती, कस्तुरमोगरा, कदंब इत्यादी पुष्पवृक्ष, तसेच पटावरील प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्यागार राहणाऱ्या इतर वृक्षांनी ते अत्यंत शोभायमान दिसत असे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...