२२ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पहिला भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - एकदा स्वायंभुव मनू एकाग्रचित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करीत होते. ते झोपेत बरळत आहेत असे वाटून भुकेलेले असुर आणि राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले. हे पाहून अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम नावांच्या देवांसह तेथे आले. खाण्याच्या उद्देशाने तेथे आलेल्या त्या सूरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले.
स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. तो अग्निपुत्र होता. द्युमान, सुषेण, रोचिष्मान इत्यादी त्यांचे पुत्र होते. त्या मन्वन्तरात इंद्राचे नाव रोचन होते.तुषित इत्यादी देवगण होते. ऊर्जस्तंभ इत्यादी वेदवेत्ते सप्तर्षी होते. त्या मन्वन्तरात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता होती. भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभु नावाने प्रसिद्ध झाले. ते आजीवन ब्रह्मचारी राहिले. त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन अठ्ठ्याऐंशी हजार व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले.
उत्तम हा तिसरा मनू होता. तो प्रियव्रताचा मुलगा होता. त्याच्या पुत्रांची नावे पवन, सृंजय, यज्ञहोत्र इत्यादी होती. त्या मन्वन्तरात वशिष्ठांचे प्रमद इत्यादी सात पुत्र सप्तर्षी होते. सत्य, वेदश्रुत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजित होते. त्यावेळी धर्माची पत्नी सुनृता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतांनी सत्यसेन या नावाने अवतार घेतला. त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगन होते. त्यावेळचा इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतांनी असत्यपरायण, दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष, राक्षस तसेच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला.
चौथ्या मनूचे नाव तामस असे होते. तिसरा मनू उत्तमाचा तो भाऊ होता. पृथू, ख्याती, नर, केतू इत्यादी त्याचे दहा पुत्र होते. सत्यक, हरी, आणि वीर नावाचे देव होते. इंद्राचे नाव त्रिशिख असे होते. त्या मन्वन्तरात ज्योतिर्धाम इत्यादी सप्तर्षि होते. परीक्षिता, त्यावेळी विधृतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते. कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचविले या मन्वन्तरातही हरीमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतांनी हरी नावाने अवतार घेतला. याच अवतारात त्यांनी गजेंद्राराचे मगरापासून रक्षण केले होते.
परीक्षिताने विचारले - हे व्यासपुत्र, भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसे सोडविले, ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो. सर्व कथांमध्ये तीच कथा परम पुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्यांने वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन केलेले असते.
सुत म्हणतात - शौनकादी ऋषींनो, राजा परीक्षित आमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता. त्याने जेव्हा श्रीशुकदेवांना अशाप्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केले, तेव्हा ते आनंदित झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेल्या सभेत कथा सांगू लागले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...