२२ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पहिला भाग - १

श्री गणेशाय नमः परीक्षिताने विचारले - गुरुदेव, स्वायंभुव मनूचा वंश मी विस्ताराने ऐकला. याच वंशात मरीची वगैरे प्रजापतींनी, आपली वंशपरंपरा चालविली होती. आता आपण आम्हांला दुसऱ्या मनूंविषयी सांगावे. हे ब्रह्मण, ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वन्तरांमध्ये भगवंतांच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन करतात, ते आपण सांगावे. आम्ही त्याचे श्रवण करू इच्छितो. हे ब्रह्मण, विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मन्वन्तरांमध्ये ज्या ज्या लीला केल्या, सध्या ज्या करीत आहेत आणि यापुढील मन्वन्तरांमध्ये ज्या काही करतील, ते सर्व आम्हांस ऐकवावे.
श्रीशुक म्हणाले - या कल्पात स्वायंभुव वगैरे सहा मन्वन्तरे होऊन गेली आहेत. त्यांपैकी पहिल्या मन्वन्तराचे मी वर्णन केले. त्यामध्ये देवता इत्यादींची उत्पत्ती झाली होती. स्वायंभुव मनूची कन्या आकूतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहूतीपासून कपिल मुनींच्या रुपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी, भगवंतांनी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला होता. परीक्षिता, भगवान कपिलांचे वर्णन मी या आधीच (तिसऱ्या स्कंधामध्ये) केले आहे. आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केले, त्याचे वर्णन करतो.
भगवान स्वायंभुव मनू सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राज्यत्याग करून पत्नी शतरूपेबरोबर तपश्चाऱ्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेले. परीक्षिता, सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभे राहून शंभर वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली. त्यावेळी ते दररोज भगवंतांची अशी स्तुती करीत.
मनू म्हणत - ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होते, परंतु हे विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही, जे, हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात, ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही, परंतु विश्वाला जे जाणतात, तेच हे परमात्मा. हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्व चराचर त्या परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहे. म्हणुन मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्याने दिलेल्या वस्तूंचाच जीवननिर्वाहासाठी उपभोग घ्यावा आणि कोणाच्याही धनाचा लोभ धरू नये. भगवंत सर्वांना पाहतात, पण त्यांना कोणी पाहात नाही. ज्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे, त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या असंग परमात्म्याला शरण जा. ज्यांचा आदी,अंत किंवा मध्य नाही, ज्यांना कोणी आपला नाही कि परका नाही, कोणी बाहेर नाही की कोणी हात नाही, तेच विश्वाचे आदी,अंत, मध्य, आपले, परके, बाहेर, आत (असे) सर्व काही आहेत, ज्यांच्या सत्तेमुळेच विश्वाची सत्ता आहे, तेच सत्य परब्रम्ह आहेत. तेच परमात्मा विश्वरूप आहेत. त्यांना अनंत नावे आहेत. ते सर्वशक्तिमान, सत्य, स्वयंप्रकाश, अजन्मा आणि पुराणपुरुष आहेत. आपल्या शक्तिरूप मायेने तेच जन्म वगैरेंचा स्वीकार करतात आणि आपल्या विद्याशक्तीने त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूपमात्र राहातात. ऋषी नैष्कर्म्यस्थितीसाठी आधी कर्मयोगाचे अनुष्ठान करतात. कारण कर्म करणारा पुरुषच शेवटी निष्क्रिय होऊन कर्मांपासून मुक्त होतो. सर्वशक्तीमान भगवंतसुद्धा कर्मे करतात. परंतु ते आत्मलाभाने परिपूर्ण असल्याने त्या कर्मांमध्ये आसक्त होत नाहीत. म्हणून त्यांचे अनुकरण करणारेसुद्धा कर्मबंधनांपासून मुक्त होतात. भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नाही. ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामना नाही. कोणाच्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंदरूपानेच कर्म करीत असतात. आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहुन ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात. तेच सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि त्याचे रक्षक आहेत. त्या प्रभूंना मी शरण आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...