आदिती म्हणाली - हे गृहस्थाश्रमी ब्रह्मण ! ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी या सर्वांचे कुशल आहे. गृहस्थाश्रमच धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेष्ठ उत्पत्तिस्थान आहे. हे ब्रह्मन, आपले निरंतर स्मरण असल्यामुळे आग्नी, अतिथी, सेवक, भिक्षुक आणि अन्य याचकांची मी कधीही हेळसांड केलेली नाही. हे भगवन, आपल्यासारखे प्रजापती जेव्हा मला धर्मपालनाचा असा उपदेश करतात, तेव्हा माझ्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही ? हे मरीचीपुत्र ! सत्त्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी अशी सारी प्रजा काही आपल्या संकल्पाने, तर काही शरीरापासून उत्पन्न झाली आहे. भगवन, आपण असुरादी सर्व संततीविषयी सारखाच भाव ठेवता. तथापि स्वतः परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांच्याच इच्छा पूर्ण करतात. म्हणून हे उत्तम व्रत असलेल्या प्रभो, आपलीच सेवा करणाऱ्या माझ्या कल्याणाचा आपण विचार करावा. ज्यांची संपत्ती आणि राहाण्याचे ठिकाणसुद्धा शत्रूंनी हिरावून घेतले आहे, अशा आमचे आपण रक्षण करावे. बलवान दैत्यांनी माझे ऐश्वर्य, धन, यश आणि स्थानसुद्धा हिरावून घेऊन मला घराच्या बाहेर काढली आहे. त्यामुळे मी सध्या दुःखसागरात बुडाले आहे. आमचे भले करणारा आपल्याशिवाय श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणून हे माझ्या हितचिंतक स्वामी, आपण विचार करून माझ्या कल्याणाचा असा उपाय सांगा की, माझ्या मुलांना ऐश्वर्यादी पुन्हा प्राप्त होतील.
श्रीशुक म्हणतात - अदितीने जेव्हा कश्यपांना अशी प्रार्थना केली, तेव्हा आश्चर्य व्यक्त करीत ते म्हणाले, भगवंतांच्या मायेचे केवढे हे सामर्थ्य ! हे सर्व जग तिने प्रेमाच्या धाग्यानी बांधलेले आहे. कुठे हे पंचमहाभूतांनी बनलेले आत्मरहित शरीर आणि कुठे तो प्रकृतीच्या पलीकडील आत्मा ? कोणाचा कोणी पती नाही, पुत्र नाही ही बांधवही नाही. मोहच मनुष्याला असे भासवीत आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भक्ताचे दुःख दूर करणाऱ्या, जगद्गुरु भगवान वासुदेवांची तू आराधना कर. श्रीहरी अतिशय दीनदयाळू आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. भगवंतांची भक्ती कधी व्यर्थ जात नाही, हे माझे ठाम मत आहे. याखेरीज दुसरा उपाय नाही.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा