०३ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय तेरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव हा सध्याच्या मन्वन्तराचा सातवा मनू होय. त्याच्या मुलांविषयी ऐक. हे राजा, वैवस्वत मनूचे इक्ष्वाकू,नभग,धृष्ट, शर्याती, नरिष्यन्त, नाभाग, दिष्ट, करूष, पृषध्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत. राजा, या मन्वन्तरात आदित्य, वसू, रुद्र, विश्वेदेव,मरुद्ण, अश्विनीकुमार आणि ऋभू हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भरद्वाज हे सप्तर्षी आहेत. या मन्वन्तरामध्येसुद्धा कशापासून अधितिच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने, भगवान विष्णूंनी अवतार घेतला.
अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मन्वन्तरांचे वर्णन ऐकविले. आता भगवंतांच्या शक्तिने युक्त अशा पुढे होणार्‍या सात मन्वन्तरांचे वर्णन करतो.
परीक्षिता, मी तुला यापूर्वीच (सहाव्या स्कंधामध्ये) सांगितले होते कि, संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्नी होत्या. काही लोक म्हणतात की, त्यांची वडवा नावाची तिसरी पत्नी होती. त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम,यमी आणि श्राध्ददेव अशी तीन संताने झाली. छायेला सुद्धा सावर्णी, शनैश्र्चर आणि उपती नावाची कन्या, अशी तीन संताने झाली. तपती संवरणाची पत्नी झाली. वडवेचे पुत्र अश्‍विनीकुमार झाले. आठव्या मन्वन्तरात सावर्णी मनू होईल. निर्मोक, विरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील. त्यावेळी सुतपा, विरजा आणि अमृतप्रभ नावाचे देवगन होतील. विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल.
तीन पावले भूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले. ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते, त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले. यावेळी तोच इंद्राप्रमाणे तेथे आहे. यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचासुद्धा त्याग करून परम सिद्धी प्राप्त करून घेईल. गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्र्वत्थामा, कृपाचार्य, ऋष्यशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्वन्तरात सप्तर्षी होतील. सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रममंडलात राहात आहेत. देवगुह्याची पत्नी सरस्वतीपासून सर्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल. हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील.
हे राजा, वरुणाचा पुत्र दक्षसावर्णी नववा मनू होईल. भूतकेतू, दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील. पार,मरीचिगर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल. त्या मन्वन्तरामध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील. आयुष्मानाची पत्नी अंबुधारेपासून ऋषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल. अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०२ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - ३

श्री गणेशाय नमः हे राजा, वास्तविक ती सुंदरी म्हणजे भगवंतांनी रचलेली मायाच होती. म्हणून तिने शंकरांच्या बाहुपाशातून स्वत:ला सोडविले आणि ती वेगाने पळून गेली. शंकरसुद्धा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवान विष्णूंच्या मागे मागे शत्रू असणाऱ्या कामाने जिंकल्याप्रमाणे धावू लागले. कामुक हत्तिणीच्या मागे धावणाऱ्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे ते मोहिनीच्या मागे मागे धावत होते. ते अमोघवीर्य असूनही तिच्या मागे धावताना त्यांचे स्खलन झाले. हे राजा, भगवान शंकरांचे वीर्य पृथ्वीवर जिथे जिथे पडले तेथे तेथे सोन्या-चांदीच्या खाणी तयार झाल्या. नद्या, सरोवरे, पर्वत, वने, उपवने. तसेच जेथे जेथे ऋषी निवास करीत होते तेथे तेथे मोहिनीच्या पाठोपाठ शंकर गेले. हे परीक्षिता, वीर्यपात झाल्यानंतर भगवंतांच्या मायेने आपल्याला ठकविल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतःला त्या लाजिरवाण्या प्रसंगातून सावरले. यानंतर आत्मस्वरूप सर्वात्मा भगवंतांचा हा महिमा जाणून त्यांना विशेष असे आच्श्रर्य वाटले नाही. कारण भगवंतांच्या शक्तींचा अंत कोणाला लागणार आहे ? भगवंतांनी पाहिले की,भगवान शंकरांना या गोष्टीचा खेद किंवा लज्जा वाटली नाही, तेव्हा ते पुरूषशरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने त्यांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - हे देवाधिदेवा, माझ्या स्त्रीरुपी मायेने पूर्णपणे मोहीत होऊन सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात राहिलात, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मायेला अंत नाही. ती अशा काही गोष्टी करते की, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली नाहीत, तो तिच्यात गुंतला की कोणत्याही प्रकारे तिच्यापासून आपली सुटका करून घेऊ शकत नाही. आपणच याला अपवाद आहात. ती ही माझी गुणमय माया आपल्याला कधी मोहीत करणार नाही. कारण सृष्टीसाठी योग्यवेळी तिला कार्यरत करणारा काल मीच आहे, म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रजोगुण इत्यादींची उत्पत्ती करू शकत नाही.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता, अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला. तेव्हा त्यांच्या निरोप घेऊन व त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले. हे राजा, भगवान शंकरांनी स्तुती करणाऱ्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णूरुपाच्या अंशभूत असणाऱ्या मायेविषयी असे सांगितले. " देवी, परमपुरुष परमेश्वर भगवान विष्णूंची माया तु पाहिलीस ना ? मी सर्व कालांचा स्वामी आणि स्वतंत्र असूनही त्या मायेपुढे हरलो, मग परतंत्र असणाऱ्या सामान्य जीवांची काय कथा ? जेव्हा मी एक हजार वर्षाच्या समाधीनंतर जागृत झालो होतो, तेव्हा तू माझ्याजवळ येऊन विचारले होतेस की, मी कोणाची उपासना करीत होतो ? ते हेच साक्षात सनातन पुरुष आहेत. कालाचे सामर्थ्य यांच्यावर चालत नाही की वेद त्यांचे वर्णन करू शकत नाहीत.
श्रीशुकाचार्य म्हणतात - प्रिय परिक्षिता, ज्यांनी समुद्र-मंथनाच्यावेळी आपल्या पाठीवर मंदराचल धारण केला, त्या भगवंतांचा पराक्रम मी तुला सांगितला. जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो, त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाहीत. कारण पवित्रकीर्ती भगवंतांचे गुण आणि लीला यांचे गायन संसारातील सर्व क्लेश नष्ट करणारे आहे. अभक्तांना भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही. भक्तिभावयुक्त पुरुषांनाच ते प्राप्त होतात. म्हणूनच त्यांनी स्त्रीचे मायामय रूप धारण करून दैत्यांना मोहित केले आणि आपल्या चरणांना शरण असलेल्या देवांना समुद्र-मंथनातून निघालेल्या अमृताचे पान करविले. जो कोणी त्यांच्या चरणकमलांना शरण जाईल, त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करतात. त्या प्रभूंच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - २

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - जेव्हा शंकरांनी भगवान विष्णूंना अशी प्रार्थना केली, तेव्हा ते गुढपणे हसून शंकरांना म्हणाले.
श्रीभगवान म्हणाले - ज्यावेळी अमृतकलश दैत्यांच्या हाती गेला होता, तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहविण्यासाठी मी ते स्त्रीरूप धारण केले होते. हे महादेवा, आपण ते पाहू इच्छिता म्हणून मी आपल्याला ते रूप दाखवीन. परंतु ते रूप कामी पुरुषांना विशेष आवडणारे असून कामभावांना उत्तेजित करणारे आहे.
श्रीशुक म्हणतात - असे बोलता बोलताच भगवान तेथेच अंतर्धान पावले आणि भगवान शंकर पार्वतीसह चोहोकडे पाहात तेथेच बसून राहिले. इतक्यात त्यांना एक उपवन दिसले. त्यामध्ये रंगीबेरंगी फुले आणि लालसर पालवी असलेले वृक्ष होते. त्या उपवनात एक सुंदर स्त्री चेंडू जमिनीवर आपटून खेळत होती. तिने रेशमी पैठणी परिधान केलेली असून तिच्यावर कमरपट्टा शोभत होता. चेंडू जमिनीवर आपटून आणि नंतर उडी मारून पकडल्याने तिचे स्तन आणि त्यावरील हार हालत होते. त्यावेळी वाटत होते की, जणू त्यांच्या भाराने मोडू शकणारी बारीक कंबर प्रत्येक पावलागणिक सावरिती आपली पालवी सावरीत ती आपली पालवीसारखी तांबूस सुकुमार पावले टाकीत आहे. उसळणारा चेंडू जेव्हा इकडे तिकडे पडत असे, तेव्हा ती झेप घेऊन तो अडवीत असे. त्यामुळे तिचे भिरभिरणारे आकर्ण नेत्र थोडेसे त्रासल्यासारखे होत असत. कानातील कुंडलांचे तेज तिच्या गालांवर झगमगत होते आणि काळे भोर केस त्यांच्यावर भुरभुरत होते. त्यामुळे तिचा चेहरा अधिकच शोभत होता. जेव्हा तिची पैठणी ढळत असे आणि वेणीतील केस सुटत असत, तेव्हा सुकुमार अशा डाव्या हाताने ती ते सावरीत असे आणि उजव्या हाताने चेंडू जमिनीवर आपटीत असे. अशा रीतीने सर्व जगाला आपल्या लीलेने भुलवीत असे. चेंडूने खेळता खेळता किंचित लाजत स्मित हास्य करून तिरप्या नजरेने तिने शंकरांकडे बघितले. अशा तिला पाहताच शिव स्वत:ला विसरले. ते मोहिनीकडे निरखून पाहाता पाहाता तिच्या कटाक्षांनी इतके बेभान झाले की, त्यांना स्वतःची शुद्ध राहिली नाही.मग जवळ बसलेल्या पार्वतीचे आणि गणांचे तरी भान कोठून असणार ? एकदा मोहिनीच्या हातातुन चेंडू उसळी मारून थोडासा लांब गेला. तीसुद्धा त्याच्या पाठीमागे धावली. त्यावेळी शंकर पाहात असतानाच वाऱ्याने तिची सळसळणारी साडी कमरपट्ट्यासह वर उडाली. मोहिनीचे अंग प्रत्यंग अत्यंत सुंदर आणि नयनमनोहर होते. जेथे दृष्टी पडेल, तेथे मन गुंतत असे. मोहिनीसुद्धा आपल्यावर आसक्त आहे, असे वाटून शंकर तिच्याकडे अत्यंत आकर्षित झाले. तिने त्यांचा विवेक हिरावून घेतला. तिच्या हावभावांनी ते कामातुर झाले आणि पार्वती समोर असतानाच लज्जा सोडून ते तिच्यापाठोपाठ गेले.
शंकर आपल्याकडे येत असलेले पाहून वस्त्र ढळलेली ती अत्यंत लज्जित झाली. ती एका झाडाआडून दुसऱ्या झाडाआड जाऊन लपत होती आणि हसत होती. परंतु ती एके ठिकाणी थांबत नसे. भगवान शंकरांचे मन त्यांच्या अधीन राहिले नाही. ते कामवश झाले. म्हणून हत्ती हत्तिणीच्या पाठीमागे धावत जातो. त्याप्रमाणे तिच्या मागे मागे ते धावू लागले. वेगाने धावत जाऊन त्यांनी तिचा पाठलाग केला व तिची वेणी पकडली आणि तिची इच्छा नसतानाही तिला बाहुपाशात पकडले. हत्ती हत्तिणीला आलिंगन देतो, तसे भगवान शंकरांनी तिला आलिंगन दिले. इकडे तिकडे सरकून निसटण्याचा तिने प्रयत्न केला, तेव्हा तिचे केस विस्कटले.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बारावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकदेव म्हणतात - श्रीहरींनी स्त्रीचे रूप धारण करून असुरांना मोहित करून देवांना अमृत पाजले. हे ऐकून भगवान शंकर पार्वतीसह नंदीवर बसून, समस्त भूतगणांना बरोबर घेऊन, जेथे भगवान मधुसूदन होते, तेथे त्यांच्या दर्शनासाठी गेले. भगवान श्रीहरींनी मोठ्या प्रेमाने गौरी-शंकरांचे स्वागत केले. तेसुद्धा स्वस्थपणे बसून भगवंतांचा सन्मान करीत स्मितहास्यपूर्वक म्हणाले.
श्रीमहादेव म्हणाले - देवाधिदेवा, आपण विश्वव्यापी, जगदीश्वर तसेच जगत्स्वरूप आहात. सर्व चराचर पदार्थाचे मूळ कारण, ईश्वर आणि आत्मासुद्धा आपणच आहात. या जगताचे आदी अंत आणि मध्य ज्याच्यापासून होतात, परंतु ज्या अविनाशी स्वरुपाला आदी मध्य आणि अंत नाहीत, ज्यांच्यामध्ये द्रष्टा-दृश्य, भोक्ता-भोग्य असे भेद नाहीत, ते सत्य, चिन्मात्र ब्रम्ह आपणच आहात. कल्याणी इच्छिणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दोहोंची आशक्ती सोडून तसेच सर्व कामनांचा त्याग करून आपल्या चरणकमलांचीच आराधना करतात. आपण अमृतस्वरुप, सर्व प्राकृत गुणांपासून रहित, शोकाच्या सावलीपासूनसुद्धा दूर, स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहात. आपण केवळ आनंदस्वरुप व निर्विकार आहात. आपल्यापासून वेगळे असे काही नाही, परंतु आपण सर्वांपासून वेगळे आहात. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण आहात. आपण सर्व जिवांच्या शुभाशुभ कर्मांचे फळ देणारे आहात. परंतु ही गोष्टसुद्धा जिवांच्या अपेक्षेनुसारच सांगितली जाते. वास्तविक आपण सर्व अपेक्षारहित आहात. स्वामी, जसे अलंकाररूपाने असणारे सोने आणि मुळ सोने यांमध्ये काही अंतर नाही, तसेच कार्य आणि कारण, द्वैत आणि अद्वैत, जे काही आहे ते सर्व एकमात्र आपणच आहात. आपल्या खऱ्या स्वरूपाला लोकांनी न जाणल्याकारणाने आपल्यामध्ये नाना प्रकारचे भेदभाव आणि विकल्पांची त्यांनी कल्पना करून ठेवली आहे. यामुळेच आपल्यामध्ये कोणतीही उपाधी नसताना गुणांमुळे भेद आहे, असे वाटते. प्रभो, काहीजण आपल्याला ब्रह्म समजतात, तर दुसरे कोणी धर्म म्हणून आपले वर्णन करतात. तसेच कोणी आपल्याला प्रकृति आणि पुरुष यांच्या पलीकडे असणारे परमेश्वर माणतात, तर काही विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, सत्या, ईशाना आणि अनुग्रह-या नऊ शक्तींनी युक्त परमपुरुष म्हणतात, तर दुसरे काहीजण स्वतंत्र, अविनाशी, महापुरुष माणतात, प्रभो, मी, ब्रह्मदेव आणि मरीची इत्यादी ऋषी-जे सत्वगुणी सृष्टीतील आहेत, तेसुद्धा आपण बनविलेल्या सृष्टीचे रहस्य जाणत नाहीत, तर ज्यांचे चित्त मायेने मोहीत आहे, असे नेहमी रजोगुणी व तमोगुणी कर्मे करणारे असुर आणि मनुष्य ते रहस्य काय जाणणार ? प्रभो ! आपण सर्वात्मक आणि ज्ञानस्वरूप आहात. म्हणून वायुप्रमाणे आकाशात अदृश्य राहूनसुद्धा आपण सर्व चराचर जगतामध्ये नेहमी विद्यमान असता. तसेच त्यांची कार्ये, स्थिती, जन्म, नाश, प्राण्यांचे कर्म तसेच संसाराचे बंद-मोक्ष हे सर्व जणता. आपण गुणांचा स्वीकार करून लीला करण्यासाठी पुष्कळसे अवतार घेता, ते मी पाहिले आहेतच. आता मी आपण घेतलेला स्त्रीरूप अवतार पाहू इच्छितो. ज्याच्याद्वारे दैत्यांना मोहित करून आपण देवतांना अमृत पाजले,ते रुप पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हांला ते पाहण्याची उत्कंठा आहे.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

०१ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - ३

श्री गणेशाय नमः तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ गेले. म्हणून मी आता ते घेणार नाही. ब्रह्मतेजापासून हे बनले असले, तरी ते आज निरुपयोगी झाले आहे. अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेला पाहून आकाशवाणी झाली की, " हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही. याला मी वर दिला आहे की, सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही. म्हणून इंद्रा, या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ. " ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला. तेव्हा त्याला सुचले की, समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही. म्हणून इंद्राने सुकलेला, ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुचीचे मस्तक उडविले. त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून त्याची स्तुती केली. गंधर्वांतील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले, देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या. वायू, अग्नी, वरुणादी दुसऱ्या देवांनीसुद्धा सिंह हरिणांना मारतात, तसे आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले. परीक्षिता, इकडे ब्रह्मदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठविले आणि त्यांना लढण्यापासून परावृत्त केले.
नारद म्हणाले - दिवांनो, भगवंतांच्या कृपेमुळे तुम्हांला अमृत मिळाले आणि तुम्ही वैभवसंपन्नही झालात. म्हणून आता लढाई बंद करा.
श्रीशुक म्हणतात - देवांनी नारदांचे म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले. त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गायन करीत होते. युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले. तेथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले. शुक्राचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली. जगाचे तत्त्व जाणणाऱ्या बलीला पराजित होउनसुद्धा खेद झाला नाही.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - २

श्री गणेशाय नमः देवर्षी नारदाकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमूची,बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोहोचले. आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात, त्याप्रमाणेच त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. बलाने हातचलाखीने एकदम एक हजार बाण सोडले आणि इंद्राच्या एक हजार घोड्यांना घायाळ केली. पाकाने शंभर बाण मातलीवर टाकले आणि शंभर बाणांनी रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला. युद्धभूमीवर ही एक मोठी अद्भुत घटना घडली. नमुचीने, सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला. जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात, त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून इंद्र, त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले. इंद्र कुठेच दिसत नाही, हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले. तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले. सेनापती नसल्यामुळे, समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होते, तशी त्यांची झाली. परंतु थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे,रथ,ध्वज आणि सारथ्यासह इंद्र बाहेर आला. तेव्हा प्राप्त:काळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा, आकाश आणि पृथ्वी उजळून शोकतो, त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला. रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले. परीक्षिता, त्या आठ धारा असलेल्या तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडविली.
परीक्षिता, आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले. त्याचबरोबर असह्य क्रोध आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जिवापाड प्रयत्न करू लागला. "इंद्रा, आता तू वाचत नाहीस ! "अशी आरोळी ठोकीत सैन्याच्या घंटा असलेल्या एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागारागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूल त्याने इंद्रावर फेकला. परीक्षिता, तो त्रिशूल अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडविण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला. इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्रप्रहार केला होता, तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटलेसुद्धा नाही ज्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते, त्या वज्राला नमूचीच्या गळ्याच्या त्वचेने तुच्छ लेखावे, ही मोठीच आच्श्रर्यकारक घटना घडली. वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही, हे पाहून इंद्र त्याला घाबरला. तो विचार करू लागला की, " सर्व जगाला न कळणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का ?" पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते आणि हिंडण्याफिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत असत, तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या प्रर्वतांचे पंख तोडून टाकले होते. त्वष्ट्याच्या तपश्र्चर्येचे सार वृत्रासुररूपाने प्रगट झाले होते. त्यालासुद्धा मी याच वज्राने मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने ज्यांच्या त्वचेला खरचटतही नसे, अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला पाठविले होते.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अकरावा भाग - १

श्रीगणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली. अगोदर इंद्र, वायू इत्यादी देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते, त्यांच्यावरच ते आता पूर्ण ताकदीनिशी प्रहार करू लागले. ऐश्वर्यशाली इंद्राने बलीशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले, तेव्हा सगळ्या प्रजेत हाहाकार माजला. युद्धासाठी सज्ज होऊन मानी बली युद्धभूमीवर संचार करीत होता. तो आपल्या समोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटले. मुर्खा, ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हातचलाखीने त्यांचे धन उठून नेतो, त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजय मिळवू इच्छितोस. जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात, इतकेच नव्हे तर त्याच्यावरील लोकांवरही अधिराज्य गाजवू इच्छितात, त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरूनसुद्धा खाली ढकलून देतो. अरे मतिमंदा, आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो. तू तुझ्या बांधवांसह सज्ज हो.
            बली म्हणाला - जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात, त्या सर्वांनाच जयपराजय, यशापयश किंवा मृत्यु क्रमाने प्राप्त होतोच. म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या अधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत. हे तुम्हांला माहीत दिसत नाही ! या सर्वांचे कारण स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या व म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणाऱ्या तुमच्या मर्मभेदी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही.
            श्रीशुकदेव म्हणतात - वीरविजयी बलीने इंद्राला अशा प्रकारे फटकारले. त्यामुळे तो थोडासा वरमला. तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले. सत्यवादी, देवशत्रू बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला. त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीच चिडला. तो पाणउतारा त्याला सहन झाला नाही. शत्रूंजय इंद्राने बलीवर आपल्या अमोघ वज्राचा प्रहार केला. त्यामुळे घायाळ होऊन बली पंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनासह जमिनीवर कोसळला. बलीचा हितचिंतक आणि घनिष्ठ मित्र जंभासुर, आपला मित्र खाली पडलेला पाहून त्याला मारणाऱ्याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून गेला. सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला. त्याचबरोबर त्या महावलीने ऐरावतावरसुद्धा गदेचा एक तडाखा दिला. गदेच्या माराने ऐरावताला भोवळ आली. त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो पूर्ण मूच्छित होऊन पडला. त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली एक हजार घोडे जुंपलेला रथ घेऊन आला. तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला. दानवश्रेष्ठ जंभाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मितहास्य करीत जळजळीत त्रिशूळ त्याच्यावर फेकला. मातलीने मोठ्या धैर्याने ते असह्य कष्ट सहन केले. तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जंभाचे मस्तक उडवले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...