०४ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय तेरावा भाग - १

श्रीशुकाचार्य म्हणतात - इक्ष्वाकूचा पुत्र होता निमी. त्याने यज्ञ प्रारंभ करून महर्षी वसिष्ठांना ऋत्विज होण्यासाठी आमंत्रित केले. वशिष्ठ म्हणाले की, "राजा ! इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रित केले आहे. त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईन. तोपर्यंत तू माझी वाट पाहा. " हे ऐकून राजा निमी गप्प बसला आणि वशिष्ठमुनीही इंद्राचा यज्ञ करण्यासाठी गेले. विचारी निमिने 'जीवन क्षणभंगुर आहे ' , असे समजून गुरु वशिष्ठ परतण्याआधीच दुसऱ्या ऋत्विजांकरवी यज्ञाला आरंभ केला. जेव्हा गुरु वशिष्ठ परत आले, तेव्हा त्यांनी मिनीने यज्ञाला प्रारंभ केलेला पाहून शाप दिला कि, "स्वतःला शहाणा समजणाऱ्या निमीचा देह पडो. " निमीनेही धर्माप्रमाणे न वागणाऱ्या गुरूंना शाप दिला की, "लोभामुळे धर्म न जाणणाऱ्या आपलेही शरीर पडो. " असे म्हणून आत्मविद्येत निपुण असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला. इकडे आमच्या पणजोबा वशिष्ठांनीसुद्धा आपल्या शरीराचा त्याग करुन मित्रावरुणांपासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला. श्रेष्ठ मुनींनी निमिराजाचे शरीर सुगंधी वस्तूंमध्ये ठेवले. जेव्हा याग समाप्त झाला, तेव्हा आलेल्या देवांना त्यांनी प्रार्थना केली. " हे देवांनो ! जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल, तर राजा निमीचे हे शरीर पुन्हा जिवंत होऊ दे. " देव म्हणाले - 'तथास्तु. ' त्यावेळी निमी म्हणाला "मला देहाचे बंधन नको. मुनिजन आपल्या बुद्धीला श्रीभगवंतांमध्ये स्थिर करून त्यांच्याच चरणकमलांचे भजन करतात. हे शरीर नाहीसे होणार, या भीतीने ते या शरीराशी कधीही संबंध इच्छित नाहीत. म्हणून मी आता दुःख, शोक आणि भयाचे मूळ कारण असणारे हे शरीर धारण करू इच्छित नाही. जसा पाण्यामध्ये माशाला सगळीकडेच मृत्यू येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे या शरीरालासुद्धा सगळीकडे मृत्यूच मृत्यू आहे. "

            देव म्हणाले - निमीराजा शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्या इच्छेनुसार राहिल. तो तेथे राहून सूक्ष्मशरीराने भगवंतांचे चिंतन करील. पापण्यांच्या उघडझापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल. राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल, असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचे मंथन केले मंथन केले. त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला. अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव 'जनक' झाले.देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झाल्यामुळे 'वैदेह' आणि मंथनातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचे नाव 'मिथिल' असे पडले. त्यानेच 'मिथिलापुरी' बसविली.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...