श्री गणेशाय नमः त्यावेळी हजारो राक्षसिणी मंदोदरीसह रडत रडत लंकेच्या महालांतून बाहेर पडून रणभूमीवर आल्या. लक्ष्मणांच्या बाणांनी छिन्न-वीच्छिन्न होऊन पडलेल्या आपल्या आप्तांना कवटाळून त्या हातांनी आपली छाती बडवीत मोठमोठ्याने विलाप करू लागल्या. हाय ! हाय ! लोकांना दहशत बसविणारे रावणमहाराज ! आज आमचा घात झाला ! आपण नसल्यामुळे शत्रूंनी लंकेची दुर्दशा केली आहे. आता तिचे रक्षण कोण करणार ? महाराज ! आपण कामवश झाल्याने सीतादेवींचा प्रभाव जाणला नाही. त्यामुळे आपली ही दशा झाली ! आपण राक्षस कुळाला आनंद देत होता. पण आज आम्ही सर्वजण आणि ही लंका विधवा झाली. आपले हे शरीर गिधाडांचे खाद्य बनले आणि आत्मा नरकाचा अधिकारी बनला.
श्रीशुक म्हणतात - श्रीरामचंद्राच्या आज्ञेने बिभीषणाने आपल्या नातलगांचे पितृयज्ञाच्या विधीने शास्त्रानुसार अंत्येष्टीकर्म केले. नंतर भगवान श्रीरामांनी अशोकवाटिकेच्या आश्रमात अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या श्रीसीतादेवींना पाहिले. त्या आपल्या विरहाने दु:खी आणि कृश झाल्या होत्या. आपल्या प्राणप्रिय अर्धांगिनीला दीन अवस्थेत पाहून श्रीरामांचे हृदय करूणेने व्याकूळ झाले. इकडे भगवंतांचे दर्शन झाल्याने सीतादेवींचे हृदय आनंदाने भरून गेले. त्यामुळे त्यांचे मुखकमल उल्हासित झाले. भगवंतांनी बिभीषणाला राक्षसांचे अधिपत्य, लंकेचे राज्य आणि एक कल्पाचे आयुष्य दिले. त्यानंतर आगोदर सीतादेवींना विमानात बसविले. नंतर लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत यांसह आपण बसले. अशा प्रकारे चौदा वर्षे पूर्ण करून ते आपल्या नगरीकडे परतले. त्यावेळी वाटेत ब्रह्मदेवादी लोकपाल त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत होते.
इकडे ब्रह्मदेवादी देव आनंदाने भगवंतांच्या लीलांचे गायन करीत होते. जेव्हा भगवंतांना समजले की, भरत फक्त गोमूत्रात शिजवलेल्या जवाच्या कण्या खातो, वल्कले नेसतो आणि जमिनीवर चटई टाकून झोपतो. तसेच त्याने जटा वाढविल्या आहेत. तेव्हा करूणेने भगवंतांचे हृदय भरून आले. जेव्हा भरताला समजले की, आपले जेष्ठ बंधू श्रीराम येत आहेत, तेव्हा तो नागरिक, मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन आणि श्रीरामांच्या पादुका डोक्यावर ठेवून त्यांच्या स्वागतासाठी निघाला. जेव्हा भरत आपले राहण्याचे ठिकाण नंदिग्राम येथून निघाला, तेव्हा लोक त्याच्याबरोबर मंगलगीते गात व वाद्ये वाजवीत चालू लागले. वेदवेत्ते ब्राह्मण वारंवार वेदमंत्रांचे पठण करीत होते. सर्वत्र सोनेरी पताका फडकत होत्या. रंगी-बेरंगी ध्वजांनी सजविलेले सुवर्णरथ, सोन्याचे खोगीर घातलेले सुंदर घोडे, तसेच सोन्याची चिलखते घातलेले सैनिक त्यांच्याबरोबर चालू लागले. शेठ-सावकार, श्रेष्ठ वारांगना आणि पायी चालणारे सेवक महाराजांना योग्य अशा लहान-मोठ्या भेटवस्तू बरोबर घेऊन त्यांच्या बरोबर निघाले.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा