२३ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय दहावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - खट्वांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा परम यशस्वी पुत्र रघू झाला. रघूचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला. देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशानेच चार रूपे धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची नावे होती.
            परीक्षिता ! सीतापती भगवान श्रीरामांचे चरित्र तत्त्वज्ञानी ऋषींनी पुष्कळसे वर्णन केले आहे आणि तू ते अनेक वेळा ऐकलेही आहेस.

            भगवान श्रीरामांनी आपल्या पित्याचे वचन सत्य करण्यासाठी राज्य सोडले आणि ते कमळासारख्या कोमल चरणांनी राना-वनांत फिरत राहिले. त्यांचे चरण इतके कोमल होते की, प्रियेच्या हातांचा स्पर्शसुद्धा त्यांना सहन होत नव्हता. तीच पावले जेव्हा वनात चालून चालून थकून जात, तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती चुरून त्यांच्या थकवा दूर करीत. शूर्पणखेला विद्रूप केल्यामुळे त्यांना प्रियेचा वियोग सहन करावा लागला. या वियोगामुळे क्रोधाने त्यांनी भुवया चढवल्या, त्या पाहून समुद्रसुद्धा भयभीत झाला. त्यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत जाऊन दुष्ट राक्षसरूप जंगल दावाग्नीप्रमाणे भस्म करून टाकले. ते अयोध्याधिपती आमचे रक्षण करोत.

            श्रीरामांनी विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये लक्ष्मणादेखतच मारीच इत्यादी राक्षसश्रेष्ठांना ठार केले. परीक्षिता ! सीतेच्या स्वयंवरमंडपात जगातील निवडक वीरांच्या सभेमध्ये तीनशे वीरांनी आणलेले भगवान शंकरांचे भयंकर धनुष्य ठेवले होते. श्रीरामांनी ते सहज उचलून त्याला दोरी लावून ते ओढले. तोच मधोमध त्याचे दोन तुकडे झाले. हत्तीच्या छाव्याने सहज ऊस मोडावा त्याप्रमाणे. वक्ष:स्थळावर मानाने राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरात जिंकले. त्या गुण, शील, वय, शरीराची ठेवण आणि सौंदर्य अशा सर्व बाबतीत श्रीरामांना सोभत होत्या. अयोध्येला परत येताना वाटेत, ज्यांनी एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती, त्या परशुरामांचा गर्व त्यांनी नष्ट केला. जरी महाराज दशरथांनी पत्नीच्या अधीन होऊन तिला तसे वचन दिले होते, तरीसुद्धा ते त्या सत्यबंधनात बांधले गेले होते. म्हणून श्रीरामांनी त्यांचे वचन सत्य करण्यासाठी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि जसा अनासक्त योगी प्राण सोडतो, तसे राज्य, लक्ष्मी, मित्र, हितचिंतक आणि महाल सोडून पत्नीबरोबर वनवास पत्करला. वनात गेल्यावर त्यांनी रावणाची बहीण शूर्पणखा हिला विद्रूप केले. कारण ती कामुक विचारांची होती. तिच्या खर, दूषण, त्रिशिरा या भावांना व अन्य चौदा हजार राक्षसांना, हातात महान धनुष्य घेऊन श्रीरामांनी ठार केले आणि अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या वनामध्ये इकडे तिकडे विहार करीत ते निवास करून राहिले.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...