मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर, कानांमध्ये विजेप्रमाणे चमकणारी कुंडले, कपाळावर झुलणारे कुरळे केस, डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत होती. संपूर्ण जगाला अभय देणाऱ्या आपल्या विश्वविजयी भुजांनी वासुकीनागाला पकडून तसेच कूर्मरूपाने पर्वताला धारण करून जेव्हा भगवान मंदराचलाच्या रवीने समुद्रमंथन करू लागले, त्यावेळी ते दुसऱ्या पर्वताप्रमाणे अतिशय सुंदर दिसू लागले. अशा प्रकारे समुद्रमंथन चालू असता समुद्रातून सुरवातीला हालाहल नावाचे अत्यंत उग्र विष निघाले. त्यामुळे समुद्रातून मासे, मगरी, साप व कासवे भयभीत होऊन वर आली आणि तिमी, तिमिंगिल इत्यादी मासे, समुद्रातील हत्ती आणि सुसरी व्याकुळ झाल्या. ते अत्यंत उग्र विष दिशा-दिशांना, वरखाली, सगळीकडे उडू आणि पसरू लागले. या असह्य विषापासून वाचण्याचा काही उपायही नव्हता. संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभीत होऊन कोठूनही वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान सदाशिवांयांना शरण गेले. भगवान शंकर पार्वतीसह कैलासपर्वतावर विश्वकल्याणासाठी बसले होते. ते तेथे मुनींना संमत असणारे तप त्यांच्या मोक्षासाठी करीत होते. प्रजापतींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती करीत त्यांना प्रमाण केला.
प्रजापति म्हणाले - हे देवाधिदेवा महादेवा, आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आणि त्यांचे जीवनदाते आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. त्रैलोक्याला भस्म करणाऱ्या या उग्र विषापासून आपण आमचे रक्षण करावे. साऱ्या जगताला बंधनात टाकण्यात आणि मुक्त करण्यात एकमेव आपणच समर्थ आहात. म्हणून विवेकी पुरुष आपलीच आराधना करतात; कारण आपण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे जगद्गुरु आहात. हे प्रभो, आपल्या गुणमय शक्तीने या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय जेव्हा करता, तेव्हा स्वतःसिद्ध ज्ञानी आपण ब्रह्मा, विष्णू, शिव अशी नावे धारण करता. आपण स्वयंप्रकाश आहात. कारण आपण परम रहस्यमय ब्रम्हतत्व आहात. सर्व प्रकारच्या उच्च-निच प्राण्यांना जीवन देणारे आपणच आहात. आपणच सर्वांचे आत्मा आहात. अनेक शक्तींच्याद्वारे आपणच जगद्रुपाने प्रतीत होता. आपणच जगाचे ईश्वर आहात. सर्व वेद आपल्यापासून प्रगट झाली आहेत; आपणच जगताचे आदिकारण महत्त्व आणि त्रिविध अहंकार आहात. तसेच प्राण, इंद्रिये, पंचमहाभूते, शब्द इत्यादी विषय आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव यांचे मूळ कारण आहात. आपणच काळ, यज्ञ, सत्य,ऋत, आणि धर्म आहात. आपणच 'अ-उ-म' या तीन अक्षरांनी युक्त असा प्रणव आहात, असे वेदवेत्ते म्हणतात. सर्वदेवस्वरूप अग्नी आपले मुख आहे. तिन्ही लोकांचे कल्याण करणाऱ्या हे देवा, ही पृथ्वी आपले चरणकमल आहे. आपण अखिल देवस्वरूप आहात. हा काळ आपली गती आहे. दिशा कान आहेत आणि वरून रसनेंद्रिय आहे. आकाश नाभी आहे,वायू श्वास आहे, सूर्य नेत्र आहे, आणि पाणी वीर्य आहे. आपला अहंकार उच्च-नीच सर्व जीवांचा आश्रय आहे. चंद्र मन आहे आणि हे प्रभो, स्वर्ग आपले मस्तक आहे. हे वेदस्वरूप भगवन, समुद्र आपले पोट आहे, पर्वत हाडे आहेत, सर्व प्रकारच्या औषधी आणि गवत आपले रोम आहेत. गायत्री इत्यादी छंद आपल्या शरीरातील सात धातू आहेत आणि सर्व प्रकारचे धर्म आपले हृदय आहे. हे स्वामी, पाच उपनिषदेच आपली पाच मुखे आहेत. त्यांच्याच पदच्छेदापासून अडतीस कलात्मक मंत्र निघाले आहेत. हे देवा, आपल्या स्वरूपामध्ये राहणे हेच आपले 'शिव'नावाचे स्वयंप्रकाश परमार्थतत्व आहे. दंभ,लोभ, इत्यादी अधर्माच्या तरंगामध्ये आपली छाया आहे.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा