साहवा मनू चक्षू याचा पुत्र चाक्षुष होता. पूरु, पूरुष, सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते. त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आपल्या इत्यादी देवगन होते. त्या मन्वन्तरात हविष्मा, वीरक इत्यादी सप्तर्षी होते. जगत्पती भगवंतांनी त्यावेळीसुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता. त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले. आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला.
राजाने विचारले - मुनिवर्य, भगवंतांनी क्षीरसागराचे मंथन कसे केले ? कच्छपरूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केले ? त्यावेळी देवांनी अमृत कसे मिळविले ? आणखी कोणकोणत्या वस्तू समुद्रातून मिळाल्या ? भगवंतांची ही मोठी अद्भुत लीला आपण मला सांगा. आपण भक्तवत्सल भगवंतांच्या महिम्याचे जसजसे वर्णन करता, तसतसे ते आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे. तृप्ती होण्याचे तर नावच नाही. कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे.
सूत म्हणाले - शौनकादी ऋषींनो, श्रीशुकदेवांनी राजाच्या या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंतांच्या पराक्रमाचे वर्णन आरंभिले.
श्रीशुकाचार्य म्हणतात - ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायाळ केले, त्यावेळी बहुतेकांना प्राणास मुकावे लागले. ते पुन्हा उठू शकले नाहीत. दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते. यज्ञ-यागादी कर्मेही लोप पावली होती. हे पाहून इंद्र, वरूण इत्यादी देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला. परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेत गेले आणि तेथे त्यांनी प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले. ब्रह्मदेवांनी पाहिले की, इंद्र, वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निस्तेज झाले आहेत. लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून हा असूर आनंदात आहे.
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा