२६ डिसेंबर २०२१

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय पाचवा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, भगवंतांची ही गजेंद्रमोक्षाची पवित्र लीला सर्व पापांचा नाश करणारी आहे. ही मी तुला सांगितली. आता रैवत मन्वन्तराची कथा ऐक. पाचव्या मनूचे नाव रैवत होते. चौथा मनूचे नाव रैवत होते. चौथा मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता. अर्जुन, बली,विंध्य वगैरे त्याचे पुत्र होते. राजा, त्या मन्वन्तरात इंद्राचे नाव विभू होते; आणि भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते. त्या वेळी हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू इत्यादी सप्तर्षी होते. त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषींच्या पत्नीचे नाव विकुंठा होते. त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वत: भगवंतांनी वैकुंठ नावाचा अवतार धारण केला. लक्ष्मीदेवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठधाम निर्माण केले. सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे. त्या वैकुंठनाथांचे कल्याणमय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी (तिसऱ्या स्कंधात) केले आहे. ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गणती केले असेल, तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल.
साहवा मनू चक्षू याचा पुत्र चाक्षुष होता. पूरु, पूरुष, सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते. त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रद्रुम होते आणि आपल्या इत्यादी देवगन होते. त्या मन्वन्तरात हविष्मा, वीरक इत्यादी सप्तर्षी होते. जगत्पती भगवंतांनी त्यावेळीसुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता. त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले. आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला.
राजाने विचारले - मुनिवर्य, भगवंतांनी क्षीरसागराचे मंथन कसे केले ? कच्छपरूप घेऊन त्यांनी कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केले ? त्यावेळी देवांनी अमृत कसे मिळविले ? आणखी कोणकोणत्या वस्तू समुद्रातून मिळाल्या ? भगवंतांची ही मोठी अद्भुत लीला आपण मला सांगा. आपण भक्तवत्सल भगवंतांच्या महिम्याचे जसजसे वर्णन करता, तसतसे ते आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे. तृप्ती होण्याचे तर नावच नाही. कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे.
सूत म्हणाले - शौनकादी ऋषींनो, श्रीशुकदेवांनी राजाच्या या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंतांच्या पराक्रमाचे वर्णन आरंभिले.
श्रीशुकाचार्य म्हणतात - ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायाळ केले, त्यावेळी बहुतेकांना प्राणास मुकावे लागले. ते पुन्हा उठू शकले नाहीत. दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते. यज्ञ-यागादी कर्मेही लोप पावली होती. हे पाहून इंद्र, वरूण इत्यादी देवांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला. परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत. तेव्हा ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेत गेले आणि तेथे त्यांनी प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले. ब्रह्मदेवांनी पाहिले की, इंद्र, वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निस्तेज झाले आहेत. लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून हा असूर आनंदात आहे.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...