श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, देवांना असे सांगून व त्यांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंतांचे निजधाम असलेल्या तमोगुणाच्या पलीकडील वैकुंठात गेले. हे राजा, भगवंतांविषयी आगोदर देवांनी ऐकले होते, परंतु त्यांचे स्वरूप पाहिले नव्हते. म्हणून ब्रह्मदेव एकाग्र मनाने वेदवाणीने भगवंतांची स्तुती करू लागले.
ब्रह्मदेव म्हणाले - भगवन, आपण निर्विकार, सत्य, अनंत, आदिपुरुष, सर्वांच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान, अखंड तसेच अतर्क्य आहात.मनाच्याही पुढे आपण जाता. वाणी आपले वर्णन करू शकत नाही. सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात. आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. आपण प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात. इंद्रिये आणि त्यांचे विषय यांना प्रकाशित करणारे आहात. आपल्याला अज्ञान स्पर्श करू शकत नाही. आपण शरीररहित असून अविद्या आणि विद्या हे जीवाचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत. आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात. सत्य, त्रेता आणि द्वापार यांमध्ये आपण अवतार घेता, म्हणून त्रियुग आहात. आम्ही आपणास शरण आहोत. हे शरीर जीवाचे एक मनोमय चाक आहे. दहा इंद्रिये आणि पाच प्राण असे पंधरा या चाकाचे आरे आहेत. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण याचा मध्य आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार हे आठ मिळून याचा परीघ आहे. स्वतः माया याचे संचालन करते आणि हे विजेपेक्षाही अधिक वेगवान आहे. स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाची धुरा. तेच एकमेव सत्य आहेत. आम्ही त्यांना शरण आहोत. जे एकमात्र ज्ञानस्वरूप, प्रकृतीच्या पलीकडचे तसेच आदृश्य आहेत, जे सर्व वस्तूंचे अव्यक्त रूप आहेत आणि देश, काल किंवा वस्तूने ज्यांचा अंत लागत नाही, तेच प्रभू या जिवाच्या हृदयात अंतर्यामीरूपाने विराजमान असतात. विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात. ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरला आहे, तिला कोण तरुण जाऊ शकणार ? परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात, त्या प्रभूंना आम्ही नमस्कार करतो. आम्ही व ऋषी ज्यांच्या प्रिय सत्त्वमय शरीरापासून उत्पन्न झालो आहोत, तरीसुद्धा त्यांच्या आतबाहेर व्यापून असणाऱ्या सुक्ष्म स्वरूपाला जाणत नाही. तर मग रजोगुण आणि तमोगुणप्रधान असूरादी त्यांना कसे जाणू शकतील ?
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा