सुत म्हणतात - जेव्हा परिक्षिताने भगवान श्रीशुकांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी, भगवंतांच्या मत्स्यावतारातील चरित्राचे वर्णन केले.
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! गाई, ब्राह्मण, देव, साधू,वेद आणि अर्थ यांचे रक्षण करण्यासाठी भगवान शरीर धारण करतात. ते सर्वशक्तिमान प्रभू वायुप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठ अशा सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामीरूपाने राहूनही त्या प्राण्यांच्या बुद्धीगत गुणांनी ते लहान-मोठे होत नाहीत. कारण ते निर्गुण आहेत. परीक्षिता, मागील कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले असता ब्रह्म नावाचा नैमित्तिक प्रलय झाला होता. त्यावेळी भूलोकादी सर्व लोक समुद्रात बुडाले होते. प्रणयकालामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते. त्याचवेळी त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले आणि त्यांच्याच जवळ राहाणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींनी दानवराज हयग्रीवाचे हे दुष्कृत्य जाणले, म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला.
परीक्षिता, त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवत्परायण राजर्षी फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत होता. तोच सत्यव्रत सध्याच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राध्ददेव नावाने प्रसिद्ध झाला आणि भगवंतांनी त्याला वैवस्वत मनु बनविले. तो राजर्षी एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. त्याचवेळी त्याच्या ओंजळीतील पाण्यात एक लहानशी मासळी आली. परीक्षिता, द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच पुन्हा नदीत सोडणे. अत्यंत कळवळून ती मासळी परम दयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली, "राजन, आपण दिनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतू आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात, हे आपल्याला माहित आहेच. तरी त्यांना भ्यालेल्या मला पुन्हा नदीत का सोडीत आहात ? " स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रुपाने आले आहेत, याची राजाला कल्पना नव्हती, तरी त्या मासळीचे रक्षण करण्याचा त्याने मनोमन संकल्प केला. त्या मासळीचे दिनवाणे बोलणे ऐकून दयाळू राजाने तिला तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणले. आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेना. त्या वेळी मासळी राजाला म्हणाली. आता मोठ्या कष्टानेसुद्धा मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही. म्हणून माझ्यासाठी एखादे मोठे ठिकाण शोधून काढ. तेथे मी आरामात राहू शकेन. राजा सत्यव्रताने मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेऱ्यात ठेवले. परंतु तेथे सोडल्यावर ती मासोळी दोन घटकात तीन हात मोठी झाली. " राजा, आता हा डेरासुद्धा मला आरामात राहायला पुरत नाही. मी तुला शरण आले आहे. म्हणून मला राहाण्यायोग्य एखादे मोठे ठिकाण दे. "परीक्षिता, सत्यव्रताने तिथून मासळीला काढून एका सरोवरात सोडले. परंतु थोड्याच वेळात ती एवढी मोठी झाली की तिने एका महान माशाचा आकार धारण करून त्या सरोवरातील पाणी व्यापून टाकले. आणि म्हणाली- "राजन, मी जलचर प्राणी आहे. ह्या सरोवरातील पाणीसुद्धा मला आरामात राहाण्यासाठी पुरेसे नाही. म्हणून आपण सुरक्षितपणे मला एखाद्या विपुल पाण्याचा खोल डोहात ठेवावे. " त्याने असे म्हटल्यानंतर राजाने एक एक करत त्याला अथांग पाणी असणाऱ्या अनेक जलाशयांत सोडले. परंतु जलाशय जेवढा मोठा असे, तेवढा मोठा तो होत असे. शेवटी राजाने मत्स्याला समुद्रात सोडण्यासाठी आणले. समुद्रात सोडीत असताना मत्स्य सत्यव्रताला म्हणाला," हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी इत्यादी राहातात, त्या मला खाऊन टाकतील. म्हणून आपण मला समुद्राच्या पाण्यात सोडू नये."
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा