११ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय अठरावा भाग - १

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंतांच्या शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्यूरहित पीतांबरधारी भगवान अदीतीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्षण नेत्र होते. श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीच झळकत होती. वक्ष:स्थळावर श्रीवत्सचिहृ, हातांमध्ये कडी, भुजांमध्ये बाजूबंद, मस्तकावर किरीट, कमरेला कमरपट्टा आणि पायांमध्ये सुंदर नूपुर झगमगत होते. आपल्या वनमालेने भगवंत विराजमान झाले होते. तिच्या चारी बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभून दिसत होता. भगवंतांनी अंगकांतीने प्रजापती कश्यपांच्या घरचा अंधकार नष्ट केला. त्यावेळी दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचे पाणी स्वच्छ झाले. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतु एकाच वेळी आपापले गुण प्रकट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गाई, ब्राह्मण आणि पवित्र या सर्वांच्या हृदयात आनंदाचा संचार झाला.
            ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला, त्यावेळी भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशी तिथी होती. अभिजित मुहूर्त होता. सर्व नक्षत्रे आणि तारे भगवंतांचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करीत होते. परीक्षिता, ज्या तिथीला भगवंतांचा जन्म झाला होता, तिला "विजयाद्वादशी" असे म्हणतात. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता. त्यावेळी शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. या निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुताऱ्यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला. अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले. मुनी, देवता, मनू, पितर आणि अग्नी स्तुती करू लागले. सिद्ध, विद्याधर, किंपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, पक्षी, प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू-गाऊ लागले. तसेच खूप स्तुती करू लागले. त्यांच्याबरोबर त्यांनी अदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला.
जेव्हा अदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्म्याला पाहिले, तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदित झाली. प्रजापती कश्यपांनीसुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेले पाहून, आश्चर्यचकित होऊन त्यांचा जयजयकार केला. भगवान स्वत: अव्यक्त आणि चित्स्वरूप आहेत. त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केले होते,त्या शरीराने, कश्यप आणि अदितींच्या समोरच जसा नट आपला वेष बदलतो, त्याप्रमाणे बटुवेषधारी ब्रह्मचाऱ्याचे रूप धारण केले. भगवंतांची लीला अगाध आहे.
            त्या वामन ब्राह्मचाऱ्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादी संस्कार करविले. जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार होऊ लागला, तेव्हा स्वतः सूर्याने त्यांना गायत्रीचा उपदेश केला. देवगुरु बृहस्पतींनी यज्ञोपवीत आणि कश्यपांनी मेखला दिली. पृथ्वीने कृष्णाजिन, वनाचा स्वामी चंद्राने दंड, माता अदितीने कौपीन व कटिवस्त्र आणि आकाशाने छत्र दिले. महाराज, अविनाशी प्रभूंना ब्रह्मदेवाने कमंडलू, सप्तऋर्षीनी कुश आणि सरस्वतीने रुद्राक्षमाळ अर्पण केली. अशा रितीने जेव्हा वामनांचा उपनयन संस्कार झाला, तेव्हा यक्षराज कुबेराने त्यांना भिक्षेचे पात्र दिले आणि सती, जगज्जननी, साक्षात भगवती पार्वतीदेवींनी भिक्षा घातली. अशा प्रकारे जेव्हा सर्व लोकांनी बटूवेषधारी भगवंतांचा सन्मान केला, तेव्हा ते ब्रह्मर्षिनी भरलेल्या सभेत आपल्या ब्रह्मतेजामुळे अत्यंत शोभायमान दिसू लागले. यानंतर भगवंतांनी, स्थापना करून प्रज्वलित केलेल्या अग्नीचे कुशांनी परिसमूहन आणि परिस्तरण करून पूजा केली व समिधांनी हवन केले.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...